सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की 4 मंत्री भेटायला जातात; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की 4 मंत्री भेटायला जातात; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांना सरकार घाबरत असून त्यांच्यापुढे पायघड्या घालत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे यांना सरकार घाबरत आहे. जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल सरकार म्हणून ठोस भूमिका असायला पाहिजे, मात्र ती दिसत नाही. सरकार मनोज जरांगे यांच्यापुढे पायघड्या घालत आहे. एक दिवस उपोषणाला बसले की चार मंत्री भेटायला जातात. त्यामुळे मनोज जरांगे यांची हिंमत वाढली असून आता त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "मनोज जरांगे ओबीसीमध्ये यायचं म्हणतात आणि त्याच ओबीसी समाजातील नेत्यांना लक्ष्य करतात. ज्या पद्धतीने ते सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य करतात, त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या नेत्यांनाही लक्ष्य करत आहेत. मनोज जरांगे यांना ओबीसी समाज सोडणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.तसेच, ज्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले त्यांना पुरावे द्यावे लागतात. मात्र जरांगे यांचे जे वक्तव्य आहे, त्यावरून आम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसींचे नेते असल्याने त्यांना मुद्दाम मनोज जरांगे यांच्याकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप राष्ट्रीय तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांनी केला आहे. मनोज जरांगे यांचे बावनकुळे यांना लक्ष्य करणे थांबले नाही, तर तेली महासंघाकडून राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही रामदास तडस यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमंत्री म्हणून महसूल विभागात आमूलाग्र बदल केले. ब्रिटिशकालीन जाचक कायदे रद्द केले. हे कर्तृत्व पाहता, ओबीसी नेते म्हणून त्यांना सतत लक्ष्य करत राहणे योग्य नाही, असेही रामदास तडस म्हणाले.दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता बावनकुळेंनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना प्रवक्ता केले आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सभेत उपस्थित केला.

बीड जिल्ह्यातील रेखा अंकुशराव अंबुरे यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात बीड येथील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढलेल्या पत्रावरून जरांगे पाटील यांनी ही टीका केली आहे.

"एकनाथ शिंदे यांना आता आपली बाजू सावरायची आहे. त्यासाठी आता बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता केले आहे. पण आज सत्तेवरील एकही सुखी नाही. ना शेतकरी सुखी, ना मराठा, ना ओबीसी सुखी आहे. त्यामुळे सरकारचा माज उतरावा लागेल. आतापर्यंत मी सरकारचा प्रत्येक डाव उधळून लावला," अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.