नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर ठिय्या; आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका ; ‘हक्काची रेल्वे मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार’
नाशिक : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवत चक्काजाम जनआंदोलन केले.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली.
आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, रेल्वेच्या मागणीवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटही झाली.
आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा मुद्दा थेट शासनाच्या केंद्रस्थानी आणला. “हा पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या सरळ रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
समृद्धी महामार्गावर झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे ऐरणीवर आला आहे.




