मुलाचा अर्ज बाद; न्यायाची अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून – अब्दुल सत्तार
मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीच्या तयारीत असलेल्या आणि नंतर तलवार म्यान केलेल्या अब्दुल सत्तार यांना एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. समीर सत्तार यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून अर्ज बाद करण्यामागे कोणतं राजकारण आहे हे सांगता येणार नाही, या बाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. अगदी क्षुल्लक कारणावरुन समीर सत्तार यांचा अर्ज बाद करण्यात आला असून आता देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील असंही सत्तार म्हणाले.

समीर सत्तार यांचा अर्ज अगजी क्षुल्लक कारणावरून बाद करण्यात आलाचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार म्हणाले की, प्रशासनाच्या मते आम्ही जिथून व्यवस्थापन करणार आहोत ती जागा आम्ही भाड्याने दिली आहे. मात्र मूळात नियम 58 मध्ये आम्ही सदस्यचं नसताना या अटी आम्हाला लागू होत नाहीत. आता हे अर्ज अवैध करण्यामागे कोणतं राजकारण आहे का हे आता सांगता येणार नाही.
समीर सत्तार यांच्या अर्ज बाद झाल्यानंतर अब्दुल सत्तार हे नाराज झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शेवटी देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, त्यांना सगळे नियम माहिती आहेत. त्यामुळे ते योग्य तो न्याय करतील, अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आमदार संजना जाधव यांचा अर्जही बाद करण्यात आला. अर्जांमध्ये किरकोळ चुका काढून हे अर्ज अवैध करण्यात आले आहेत असा आरोप आता शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम 1 जून रोजी प्रसिद्ध झाला असून 8 जुलै रोजी त्यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकारण्यास सुरुवात झाली होते. या निवडणुकीत संचालकपदासाठी शुक्रवारपर्यंत एकूण 214 उमेदवारांजे अर्ज दाखल झाले होते. त्यात, मंत्री, आमदार, खासदारांच्या मुलांसह दिग्गजांच्या अर्जाचा समावेश होता. मात्र, या दिग्गजांपैकी दोन दिग्गज नेत्यांचा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार यांचा आणि कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे.




